स्मार्ट ग्राम बिबीमध्ये जलजीवन मिशनचे ढिसाळ नियोजन

*स्मार्ट ग्राम बिबीमध्ये जलजीवन मिशनचे ढिसाळ नियोजन* 

हिंदुस्तान न्यूज 24: संजय लोहकरे 

सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर 


 कोरपना : स्मार्ट ग्राम बिबी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाच्या दर्जेदार अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने आवाज उठवला आहे. गुरुवारी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांना बिबी ग्रामपंचायत चे उपसरपंच तथा सरपंच परिषद मुंबईचे जिल्हा समन्वयक आशिष देरकर यांनी प्रत्यक्ष भेटून तक्रार केली.

गावकऱ्यांच्या कष्टाने तयार केलेल्या स्मार्ट तथा आदर्श गावातील अंतर्गत रस्ते जलजीवन मिशनच्या कामामुळे फोडून टाकले असून ते त्वरित दुरुस्त करून देण्याची मागणी करण्यात आली. तब्बल अडीच वर्षांपासून काम सुरू असून अजून पर्यंत ५० टक्के काम पूर्णपणे अपूर्ण आहे. कंत्राटदाराच्या कामकाजाच्या चुकीच्या पद्धतीमुळे गावातील ड्रेनेज सिस्टमचे नुकसान झाले असून ते व्यवस्थित करून देणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय पाईपलाईनचे काम दर्जेदार व तांत्रिक निकषांनुसार होणे अत्यावश्यक असल्याचा ठाम पवित्रा ग्रामपंचायतीने घेतला.

यावेळी ग्रामपंचायत बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, जर तातडीने दुरुस्ती व सुधारणा केल्या नाहीत तर ग्रामपंचायत स्तरावरून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल.

दरम्यान, शासनाने एकाच वेळी सर्व गावांमध्ये जलजीवन मिशनची अंमलबजावणी सुरू केल्याने विभागाकडे निधीची टंचाई निर्माण झाली आहे. कंत्राटदारांचे प्रलंबित देयक थकलेले असल्यामुळे कामकाजात ढिसाळपणा दिसून येत असल्याचे आरोपही करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या अनियोजित धोरणांमुळे ग्रामीण जीवन संकटात सापडले असून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ग्रामीण जनता सहन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments